रविवार, ऑक्टोबर २१, २००७

असंच आपलं उगीच!

आज कितीतरी दिवसांनी माझ्या ब्लॊगवर लिहायल बसले आहे....
खरंतर गेले कित्येक दिवस मी ब्लॊगवर लिहायचं असं ठरवते आहे. पण लिहायचा मूडच लागत नव्हता. कितीतरी वेळा मी अर्धवट पोस्ट लिहून नंतर डिलीट करून टाकलं. अगदी आतून लिहावसं वाटत नसताना उगाचच काहीतरी खरडण्यात काय अर्थ आहे? पण नंतर भीती वाटली की समजा अगदी कधीच वाटलं नाही लिहावसं तर मग माझा ब्लॊग मृत ब्लॊगांमध्ये जाईल का? म्हणून अगदी सरसावून पोस्ट लिहायला बसलीये खरी.
आता हे लिहिताना वाटतंय, समजा गेला मृत ब्लॊग मध्ये तर काय फरक पडणार आहे? नाहीतरी कोण इतकं चातकासारखी वाट बघतंय मी काय लिहितीये त्याची? हजारो लाखो ब्लॊग मधला एक बंद झाला तर कोणाला काय फरक पडणार आहे? मग मी कशासाठी हा लिहिण्याचा अट्टाहास करतीये?सगळे लिहितात म्हणून आपण पण काहीतरी खरडतोय ह्याला काय अर्थ आहे?
पण मग लक्षात आलं की कोणी सांगितलं म्हणून मी ब्लॊग कुठे सुरू केला होता? मला काय वाटतं ते लिहिण्यासाठीच तर मी हा ब्लॊग सुरू केलाय. मग मला जे काय वाटतंय, मग भले ते फालतू का असेना, मी ह्या ब्लॊगवर लिहू शकेन. मग त्यासाठी मला हा ब्लॊग जिवंत ठेवायलाच हवा.
आज अगदी अनायसे दसर्‍याच्या सुमुहुर्तावर पोस्ट लिहायचं मनात आलं आहे तर हे पोस्ट कितीही बोरींग असलं तरी टाकतीये. आणि आता नियमाने लिहायचं असं ठरवतीये. बघू या कितपत जमतंय!!!

शुक्रवार, जून २९, २००७

पाऊस!

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस
बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय!
तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत....
तुला आठवतं आपण पहिल्यांदा एकत्र पावसात भिजलो होतो....
पावसापेक्षाही तुझ्या सहवासाने येणारा शहारा!
नंतर जसं काही व्यसनच लागलं पावसाचं....
दरवेळी नव्याने पाऊस अनुभवायचं....
आणि मग कितीवेळा त्या कोसळणार्‍या धारांमधे हरवून जायचो आपण...
स्वत:ला विसरून.....
आणि अचानक एके दिवशी पाऊस रुसला माझ्यावर...
आता इथे कायमचाच दुष्काळाचा मुक्काम आहे!
माझं भेगाळलेलं मन वाट पहातंय पावसाची
तू म्हणशील, की इतका आठवणींचा पाऊस आहे की.....
पण तुला माहीत आहे ना....
इतकं पाणी असलं सगळीकडे तरी
चातकाची तहान भागायला पावसाचेच थेंब हवेत ना?
हल्ली नुसतंच भरून येतं मनाचं आभाळ..
माझा पाऊस तर कधीच वाहून गेला डोळ्यांमधून.....
आता तुझा पाऊस पाठवशील?

मंगळवार, जून १२, २००७

पाऊस

सुटे वारा असा बेभान आणि पिसाटते मन
धुंद बरसत येतो असा पाऊस पाऊस

त्याच्या तालात रंगून विश्व गेले मोहरून
कधी भुरूभुरू झरतो असा पाऊस पाऊस

मनी आठवांची दाटी डोळे गेले पाणावून
आणि झिम्मड झडतो असा पाऊस पाऊस

सप्तरंगांनी खुलते इंद्रधनूची कमान
नभ धरेस जोडतो असा पाऊस पाऊस

कधी पावसाची धून कधी श्रावणाचे ऊन
आणि सोनेरी सजतो असा पाऊस पाऊस

गुरुवार, एप्रिल १९, २००७

लाल है रंग प्यार का.....

आज मिटींग चालू असताना मधेच नजर बाहेर गेली. आह! गुलमोहराच्या झाडावर एकच फांदी सुरेख केशरी सजलेली दिसली. तजेलदार हिरव्या-पोपटी पानांमधे ती फांदी इतकी सुंदर दिसत होती!!!
शिशिराची पानगळ संपून आता सगळ्या झाडांवर सुंदर कोवळी पालवी दिसू लागली आहे. वसंतऋतूसोबत सगळ्याच सृष्टीवर प्रेमाचा लाल-केशरी रंग चढतो आहे!!
परवा ल मेरीडियन हॊटेलच्या जवळून जात असताना भलंमोठं पिंपळाचं झाड दिसलं ( हा एक वृक्ष आता पुण्यातू हळूहळू हद्दपार व्हायला लागला आहे. त्याच्या पानांचा अलंकारीक आकार आणि वहीत ठेवल्यावर पडणारी सुरेख जाळी आपल्या पुढच्या पिढीला माहित असेल काय?). त्याला नुकतीच पालवी फुटली होती. नवीन छोटी छोटी पानं तांब्याचा हलकाच थर दिल्यासारखी इतकी मस्त दिसत होती!
पळस, पांगारा तर केव्हाचेच लाल रंगात न्हाऊन निघाले आहेत. झाडावर एकही पान नाही. नुसती लालचुटूक फुलं. निळंभोर निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही फुलं इतकी देखणी दिसताहेत!
आता हळूहळू ऊन चढेल तसा आंबाही ह्या प्रेमाच्या रंगात रंगून जाईल. आपल्या पिवळ्या रंगावर सुरेख केशरी झाक लेऊन सजून बसेल.
तांबडा चाफाही फुलला आहेच! गुलमोहरही पूर्ण फुलून येईल. पळस-पांगार्‍याशी स्पर्धा करत आपला केशरी-लाल रंग मिरवेल. जमिनीवरही उन्हात सजून दिसणारे केशरी गालीचे अंथरेल.
आणि मग एखाद्या दिवशी सगळंच बदलेल. मुसळधार पावसाने सगळा फुलोरा जमिनीवर येईल आणि मग हिरव्या रंगाचा सृजनोत्सव सुरू होईल. तोपर्यंत आपणही ह्या प्रेमाच्या रंगात बुडून जायला काय हरकत आहे!!!

राही बदल गये!

काल फार दिवसांनी शाळेच्या ग्रुपमधली मैत्रीण भेटली. तुझी नोकरी कशी चललीये, आता कुठे असतेस, ही काय करते, ती काय करते अश्या जुजबी गप्पा झाल्या. फोन नंबर, मेल आयडी ची देवाण घेवाण झाली. आणि अचानक आम्ही गप्पच झालो. मग बळबळंच संभाषण ताणण्याचाही प्रयत्न झाला. पण बात कुछ जमी नही! मग काय, दोघीही आपापल्या वाटेने निघालो. मनात आलं, किती बदल झाला आपल्या दोघींच्यात!! शाळेत असताना दिवस दिवस गप्पांमध्ये सहज घालवायचो आणि आज काय बोलायचं असा प्रश्न पडलाय.
अगदी बालवाडीपसून ते इंजिनीयरींग पूर्ण होईपर्यंत किती तरी मित्र-मैत्रिणी झाले. त्यातल्या किती जणांशी अजूनही संपर्क आहे? लक्षात आळं की यादी खूपच लहान आहे संपर्क नसलेल्यांच्या यादीपेक्षा......
अगदी बालवाडीचं आता आठवत नाही. पण पहिलीत गेल्या गेल्या पहिल्या दिवशी माझी ओळख माझी अजूनही खास मैत्रीण असलेल्या भूपालीशी झाली होती. ती मैत्री आजही तितकीच घट्टपणे टिकून आहे. आणि आजही आमच्या दोघींच्या आयुष्यात एकही गोष्ट अशी नाही की जी एकमेकींना माहीत नाही.
सातवीला अमच्या दोघींच्या तुकड्या बदलल्या. आणि माझं सेमी इंग्लिश माध्यम झालं. त्यामुळे वर्गात, क्लासला एकत्र असणार्‍या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. मग अकरावी - बारावीत कॊलेज, क्लासमधे असलेल्या मैत्रिणींचा अजून एक, डिप्लोमाला गेल्यानंतर तिथल्या मित्र-मैत्रिणींचा अजून एक ग्रुप, मग इंजिनीयरींगच्या कॊलेजमधला एक ग्रुप, मग ऒफीसमधला ग्रुप.. कितीतरी मित्र-मैत्रीणी होते. आणि त्या-त्यावेळी ह्या प्रत्येक ग्रुपमधले लोक खूप जवळचे वाटायचे. कितीतेरी secrets आम्ही त्या वेळी share केली होती. पण आता विचार केला तर मी त्यातल्या फक्त डिप्लोमाच्या ग्रुपशी छान संपर्क ठेवून आहे. बाकी काही जणांशी कारणाने तर काही जणांशी मुळीच नाही.
असं का झालं असेल? प्रत्येकाच्याच आयुष्यात असं होत असेल का? कदाचित असं असेल की त्या त्या वेळी आपण कायम ज्या लोकांबरोबर असतो, त्या त्या लोकांशी सहवासाने घट्ट मैत्री झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात ते फक्त सहवासाचंच वेगळं रूप असतं. आणि जसा आपला सहवास कमी होईल तसं ते नातं विरतही जातं. कदाचित आपले सूर ज्या व्यक्तीशी जुळतात, त्यांच्याशीच दीर्घकाळ मैत्री टिकते. अश्या मित्र-मैत्रिणींना आपण किती वर्षांनी भेटतो आहोत यामुळे बहुधा काहीच फरक पडत नाही. ते नातं इतकं दृढ असतं की सहवासाचं बंधन उरत नाही. खरं- मनापासून उमललेलं नातं!
आपलं आयुष्य जसं जसं पुढे जाईल, तसे अनेक नवीन लोक भेटतील . कोणाशी सूर जुळतील, कोणाची साथ-संगत तेवढ्यापुरतीच असेल. आताचे काही लोक तेव्हा सोबत असतील किंवा नसतीलही. अजून खूप वर्षांनी परत मी हेच म्हणेन.
मंजील वही है - दोस्ती
राही बदल गये!

सोमवार, एप्रिल ०९, २००७

कर्तृत्त्ववती

आजी! आपल्या सगळ्यांचा किती जिव्हाळ्याचा विषय असतो नाही? आजीची मायाच अशी असते, दुधावरच्या सायीला जिवापाड जपणारी! माझा आणि आजीचा (बाबांची आई) सहवास उणापुरा ९ वर्षांचा. पण त्यातही आजीकडुन जे बाळकडू मिळालं ते मला जन्मभर पुरेल. ती गेली तेव्हा फारसं काहीच मला कळत नव्हतं. पण आज जेव्हा मी विचार करते, तेव्हा तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कितीतरी सुरेख पैलू मझ्या लक्षात येतात. आजी म्हटलं की सर्वात आधी मला आठवतं ते तिचं करारी व्यक्तिमत्त्व. भरपूर ऊंची, सणसणीत बांधा, आणि एकूणच देहबोलीतून जाणवणारा निग्रहीपणा. तिच्याकडे बघितलं की वादळवार्‍याचा सामना करून पुन्हा ताठपणे उभ्या राहणार्‍या वटवृक्षाची आठवण व्हावी. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असणारी माझी आजी. बुद्धीने अतिशय तल्लख. त्याकाळात उत्तम गुण मिळवून फायनलची परीक्षा उतीर्ण झाली होती. पाठच्या तीन बहिणी. तेव्हा कोणीतरी माझ्या पणजीला सांगितलेलं की तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. त्यामुळे फायनल झाल्या झाल्या पंधराव्या वर्षीच तिचं लग्न झालं. खरोखरच तिच्या लग्नानंतर तिला भाऊ झाला. माझे बाबा आणि त्यांचे मामा दोघेही एकाच वयाचे. आता मी विचार करते तेव्हा मला ही गोष्ट खूप मजेशीर वाटते. पण बहुधा त्यावेळच्या काळत ही सामान्य बाब असावी. सासरी देखील माझी आजी सर्वात मोठी सून असल्याने तिच्यावर मोठी जबाबदारी होती. सततचे पाहुणे, धाकटे दीर, नणंदा, त्यांची लग्न, बाळंतपणं सारं काही तिने केलं. सगळं तसं सुरळीत चाललेलं असताना अचानकच तिच्यावर फार मोठा आघात झाला. आजीचं वय अवघं बावीस वर्षाचं असताना माझे आजोबा गेले. तेव्हा माझे बाबा फक्त पाच वर्षांचे, आत्या अडीच वर्षाची आणि आजीला सातवा महिना. सार्‍या घरावर अक्षरशः आभाळ कोसळलं. ती माझी दुसरी आत्या आठ महिन्यांची होऊन गेली. "धाकटी लेक गेली तर दुःख करत बसायलाही मला सवड नव्हती. ती गेली तर निदान मी ह्या दोन मुलांसाठी तरी कमवून आणायला मोकळी झाले." आजीचे हे उद्गार आज आठवले, की त्यामगची तिची अगतिकता जाणवून डोळे पाणावतात.
घरच्या लोकांचा प्रचंड विरोध पत्करून आजीने नोकरी शोधायला सुरुवात केली. त्याकाळी (१९५५) फायनल पास झालेल्या सरकारी नोकरी मिळणं तसं काहीच अवघड नव्हतं. परंतु घरच्या लोकांनी पूर्णच असहकाराचं धोरण स्वीकारलं होतं. घरात येणारी नोकरी संदर्भातली पत्र आजीपर्यंत पोचूच देत नसत. शेवटी आजीने पत्रव्यवहारासाठी वेगळा पत्ता दिला. आणि त्यानंतर आलेली पहिली संधी - ग्रामसेविकेची नोकरी पत्करली. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना पुण्यातच ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रामसेविकेच्या नोकरीत भरपूर फिरावं लागत असे. दररोज मैलोनमैल चालावं लागे. तशीच काही अडचण असली तर रात्री बेरात्री सुद्धा कुठे कुठे जावं लागे. तरूण वय, त्यातही नवरा नसताना खेड्यापड्यात राहून हे सगळं करणं अतिशय कठीण काम होतं. पण आजीने हिमतीने सगळं केलं. अजूनही दुर्गाम आणि मगास असलेल्या जव्हार-मोखाड्यासारख्या आदिवासी भागात तिने साठच्या दशकात नोकरी केलेली आहे. ’तुला भीती नाही का वाटायची?’ असं विचारलं तर म्हणायची, ’कसली आलीये भीती? भूत - बित आलं तर तेच मला घाबरून जाईल. आणि बाळा, तेव्हा नोकरी टिकवणं हे एकमेव ध्येय होतं. त्यामुळे भीती वगैरे गोष्टींना काही थाराच नव्ह्ता.’ ही नोकरी तिने बाबांना नोकरी लागून आत्याचं लग्न होईपर्यंत केली. पुढे आई-बाबांचं लग्न झाल्यावर बाबांना Air Force quarters मिळाले आणि मग बाबांना इतक्या वर्षांनी आईजवळ रहायला मिळालं. तेव्हा आजी अगदी टिपिकल सासू होती. आई बाबा एकत्र सिनेमाला वगैरे गेलेले तिला आवडत नसे. आईला कानात रिंगा घालायलाही तिने परवनगी दिली नाही. पण आई आणि बाबांनी नेहेमीच तिला समजून घेतलं. आयुष्यभर कोणतीच हौस मौज करायला न मिळाल्यामुळे तिचा स्वभाव असा कडवट झाला असेल काय? नंतर आजीदेखिल खूपच निवळली. आणि आईशिवाय तर तिचं मुळीच पान हलत नसे. आजीचा स्वभाव सतत माणसं जोडत रहाणारा होता. घरातले सगळे लोक, नातेवाईक, इतकंच काय पण बाबांच्या सगळ्या मित्रांनाही माझ्या आजीचा खूप आधार वाटत असे. खचून गेलेल्या माणसाला नुसत्या योग्य शब्दांनी उभारी कशी देता येते हे मी आजीकडून शिकले. जे काही काम कराल ते उत्तमच केलं पाहिजे अस आमच्या आजीचा कटाक्ष असे. तिचं प्रत्येकच काम इतकं देखणं असे की नजर ठरत नसे.शिस्त हाही एक अतिशय महत्त्वाचा विषय. आजीची इतकी कडक शिस्त होती घरामधे! तेव्हा तिच्या काही काही गोष्टींचा राग यायचा, पण आता कळतं की लहानपणी तिने लावलेल्या छोट्या छोट्या सवयी आज किती उपयोगी पडतात. आपल्या घासतला घास दुसर्‍या गरजू माणसाला दिला पाहिजे हे ही तिने सतत आमच्या मनावरती ठसवलं. आजीची एक मजेशीर सवय म्हणजे दर एक-दोन वाक्यांनी तिच्या बोलण्यात एक म्हण असायची. खेडेगावात राहिल्यामुळे तर तिच्या ह्या म्हणींच्या संग्रहात खूपच भर पडलेली होती. आम्ही अगदी फारच त्रास द्यायला लागलो की ती आम्हाला ’अगं बाई, घटकाभर सुभद्राबाई काळे ( हे तिच्या आईचं नाव) हो’ असं म्हणत असे. ते ऐकायला तेव्हा खूप मजा वाटायची. आजही तिच्या तोंडून ऐकलेल्या काही म्हणी सहज बोलण्यात वपरल्या जातात. आणि बरोबरीचे लोक ही कुठेली म्हण काढलीस असं म्हणतात, तेव्हा तिने कळत नकळत आमच्या शब्दभांडारात केवढी भर घातली आहे हे जाणवतं.
दूरदॄष्टी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता हेही आजीचे घेण्यासारखे गुण होते. माझ्या आतेभावाला commerce मधे फारसं करियर करता येणार नाही, हे कळल्यावर तिने स्वतः निर्णय घेऊन त्याला योग्य वेळी ITI घातलं. माणसाचा कल ओळखून त्याप्रमाणे त्याला उत्तेजन द्यायचं हे आजीचं वैशिष्ट्यच होतं. आयुष्यात इतकं काही भोगूनही आजीनी स्वतःचं दुःख कधीही उगाळलं नाही. तिच्या आयुष्याकडून अपेक्षादेखिल खूप साध्या होत्या. पण स्वत:च घर हा तिचा अगदी वीक पॊईंट होता. आजीला ’जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं अजिबात आवडत नसे. "असं म्हणावं अशी वेळ अजूनतरी माझ्या अयुष्यात आली नाही. जेव्हा स्वतःचं घर होईल तेचा मी हे गाणं रेकॊर्ड करून घेईन आणि मग सतत तेच ऐकत बसेन. एकदा का आपलं स्वतःचं घर झालं, की राजीव गांधी एका बाजूला आणि मी एका बाजूला" (म्हणजे पंतप्रधानांइतकी सुखी) असं ती म्हणत असे. तिचं हे स्वप्न मात्र ती असताना पूर्ण झालं नाही. वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षीच आपलं स्वप्न अर्धवटच ठेवून ती गेली. मी चौथीत असताना शिष्यवृत्तीच्या परिक्षेला बसले होते. तेव्हा सगळे प्रश्न उतरवून घ्यायचे आणि मग त्यापुढे उत्तरं लिहायची असं आम्हाला शाळेत सांगितलं होतं. मला लिखाणाचा फार कंटाला यायच. तेव्हा आजी दररोज मला सगळे प्रश्न dictate करत असे. आणि मग मि ते सोडवत असे. तिने पूर्ण वर्षभर माझा असा अभ्यास करून घेतला. परंतु दुर्दैवाने मला शिष्यवृत्ती मिळली तेव्हा आजी या जगात नव्हती. त्यादिवशी निकाल कळल्या-कळल्या धो धो रडल्याचं मला आजही आठवतं. आज चतुर्थी. आजीला जाऊन आज बरोबर १७ वर्ष झाली. या सतरा वर्षात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. कधीही अगदी खचून गेल्यासारखं झालं की आजीची शिकवण आठवते आणि आपोआपच सगळं frustration कुठच्या कुठे पळून जातं. सगळ्या संकटांचा हिमतीने सामना करणारी कतृत्त्ववान आजी नेहेमीच माझा आदर्श आहे.

सोमवार, एप्रिल ०२, २००७

कळत-नकळत

काल खूप वर्षांनी कळत-नकळत बघितला परत. १२-१३ वर्षांपूर्वी बघितला तेव्हा मला खूपच आवडलेला हा सिनेमा काल मात्र मला आवडला नाही. सगळ्या कलाकारांचा उत्तम अभिनय मनात भरलाच परत एकदा. पण फार अस्वस्थ व्हायला झालं.
एक सुंदर सुखी कुटुंब. हम दो हमारे दो. मनोहरच्या जीवनात घडणारी चूक सगळ्या घरालाच मुळापसून हादरवून सोडते. उमाचा घर सोडून जाण्याचा निर्णयही अगदी पटण्यासारखाच. पण खरी बोच सुरू होते ती तिथूनच. खरंतर अगदी रस्त कारणासठी ती घर सोडून येते. तरीही तिला सतत अपराधी का वाटत रहावं? उमाचे आई-भाऊ सर्वजण तिलाच समजून घ्यायला का सांगतात? ज्या व्यक्तीने आपल्याशी प्रतारणा केली त्या व्यक्तीबरोबर राहू नये अस तिला वाटलं तर तिची काय चूक आहे? चौपाटीवर भेटलेले मुलाचे वडीलही तिला ’तुमचं एकटेपण तुमच्या स्वभावामुळेच आलं असणार’ असं म्हणतात तेव्हा खरंच संताप येतो.
मनोहरच्या हातून नकळत चूक घडते हे मान्य. पण तरीही ही सहज माफ करण्याइतकी क्षुल्लक बाब आहे का? आणि खरोखरच मनोहरचं इतकं प्रेम असेल बायको मुलांवर तर मोहाच्या क्षणी त्याला त्यांची आठवण का होत नाही? पिता म्हणून तो उत्तम असेलही, पण एक नवरा म्हणून तो चुकतोच ना?
नंतर विचार आला, आता ह्या चित्रपटालाही १७ वर्षं होऊन गेली. त्यावेळी कदाचित ’मुलांसाठी तरी तिने समजून घ्यायला हवं’ अशी भूमिका कदाचित सर्वांना योग्य वाटत असेल. पण आजही अशाच गोष्टी चक्क आपल्या सभोवताली घडताना दिसतात. ब‌‍र्याच वेळा मुलांसाठी म्हणून लग्न न मोडणारे स्त्री- पुरुष बघितले की वाटतं किती त्रासदायक आहे हे सारं.... मुलांना आई वडील दोघांचं प्रेम मिळावं म्हणून केवढा मोठा त्याग करत असतील लोक..... आणि जी व्यक्ती कळून-सवरून चुका करते तिचं/त्याचं काय? त्यांच्या जोडीदारांनी का हे सहन करत रहावं? आणि मोठेपणी त्या मुलांना वस्तुस्थिती कळल्यानंतर ती आपल्या आई-वडलांना समजून घेणार नाहीत का?
चित्रपटामधे अगदी घटस्फोट झाल्यानंतरही मनोहर उमा एकत्र रहाण्याचा निर्णय घेतात. पण तो शेवट चित्रपटात ठीक आहे.
प्रत्यक्ष जीवनात कळत - नकळत घडणारी चूकही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते हे कळणं हेच खरं या चित्रपाटचं मर्म आहे असं मला वाटतं.

बुधवार, मार्च २८, २००७

तुम्ही काय करता अश्या वेळी?

एकेक दिवस सगळ्याचच कंटाळा येतो!!!
आजचा दिवसच वाईट गेला एकूणातच. मी एका गोष्टीची बरेच दिवस वाट पहात होते ती इतक्यात होणार नाही हे कळलं.
सकाळी सकाळी अभ्यासाला बसले तर परि़क्षा अगदीच तोंडावर आलेली असूनही आपल्याला काहीही येत नाहीये हा साक्षात्कार झाला.
त्यात ऐन परिक्षेच्या तोंडावर पेटी बिघडली आहे. आणि ती परिक्षेपर्यंत दुरुस्त होऊ शकणार नाही हे ही समजलं. आता पेटीशिवाय मी कसा अभ्यास करणार आहे परिक्षेचा??
सगळा दिवस खराब करून आता संध्याकाळी लक्षात येतंय की चिडचिड करून काहीच फायदा होणार नाहीये. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे.
तुम्ही काय करता असं frustration आलं की? इतका साठून आलेला कंटाळा घालवायचे उपाय सांगेल का कोणी मला?

मंगळवार, मार्च ०६, २००७

एकांत

एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही
जेव्हा जेव्हा भेटतो, सोबत आणतोच काही ना काही

एकांत कधी हळवा, सोबत ठेवणीतल्या आठवणी
क्षणात हलकेच हसू, तर क्षणात डोळ्यात पाणी
आठवणींच्या गावातून मग परत येताच येत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत कातरवेळी हूरहूर सोबत घेऊन येतो,
सरत्या क्षणांच्या गडद सावल्या मानामधे ठेवून जातो
मनाचे दिवे उजळले तरी हूरहूर मात्र शमत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत बोलका होतो, शब्दांचं मग चांदणं होतं
एक शब्द उच्चारला तरी त्याचंसुद्धा गाणं होतं
गाण्यच्या त्या स्वरांची साथ मग सुटत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत दोघांचा होऊन दोन मनं सांधू लागतो
एकेका स्वप्नाची काडी घेऊन प्रेमाचं घरटं बांधू लागतो
स्वप्नांच्या त्या घरट्यातून मन बाहेर येतच नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कुणही सोबत आला तरी त्याचं एकच सांगणं असतं
एकांत काही क्षणांचाच - बाकी सोबतच जगणं असतं
त्या काही क्षणातच वेचावं स्वत:साठी थोडं काही
म्हणूनच तर एकांत एकटा कधी भेटत नाही

शुक्रवार, मार्च ०२, २००७

ऋतुरंग - ३

पावसाळ्यातली शिरशिरी आणाणारी थंडी संपून ऑक्टोबर हीटचा तडाखा संपला की खरीखुरी थंडी सुरू होते. गुलाबी थंडी वगैरे प्रकार काही मला कळत नाहीत पण कडाक्याची तंडी असली तरी मजाच येते. थड़ी सुरू होण्याच्या सुमाराला सबंध सह्याद्री अंगोपांगी फुललेला असतो. कोणत्याही घाटात, इतकंच काय अगदी सिंहगड, तळजाई वाघजाईला गेलं तरी इतक्या रंगांची आणि आकारांची फुलं फुललेली असतात की नजर ठरत नाही. रंगांची नुसती उधळण असते सगळीकडे. फुलांचे गालीचेच पसरलेले असतात जणू हिवाळ्याच्या स्वागतासाठी . नुसती फुलंच नाही , तर सगळ्याच गोष्टी निसर्ग अगदी भरभरून उधळत असतो.भरपूर विविधरंगी भाज्या, फळं सगळ्याचीच रेलचेल असते. पावासाळ्यातल्या सृष्टीचं नवपरिणीतेचं रूप जसं सुखावणारं असतं ना, तसंच हे परीपूर्ण रूपही तितकंच खुलून दिसतं.मग हळूहळू सगळं चैतन्य ओसरायला लागतं उन्हं चढायला लागतात आणि परत मोगर्‍याचे आणि आंब्याचे वेध लागातात!!!

बुधवार, फेब्रुवारी २१, २००७

ऋतुरंग - २

उन्हाळा संपत आला की साधारण मे महिन्याच्या शेवटी शेवटी अचानक एखाद्या दिवशी आभाळ गच्च दाटून येत असे. वार्‍याबरोबर गोल गोल उडणारी धूळ, पाळापाचोळा डोळ्यात जायला लागला तरीही मग आमच्या उत्साहाला अगदी उधाण यायचं. वळवाचा पाऊस येणार म्हणून. हळूहळू टपोरे थेंब पडायला सुरूवात झाली की मातीच्या गंधाने अक्षरश: जीव वेडावून जात असे. आह! आत्ता हे लिहित असतानासुद्धा तो सुवास मला जाणवतो आहे. बर्‍याचदा वळवाच्या पावसात गारा सुद्धा पडत. अलिकडे बर्‍याच वर्षात पुण्यात असा गारांचा पाऊस झालेला मला आठवत नाही.
पावसाळ्याविषयी तर इतक्या जणांनी इतकं काही लिहिलं आहे! पण तरीही त्याबद्दल लिहिण्याचा मोह मी आवरू शकत नाही. पावसाच्या आठवणींचा प्रत्येकाकडेच अगदी कुबेरासारखा खजिना असेल. दर वर्षी पावसाळ्याची सुरुवातच शाळेच्या खरेदीने होत असे. नवीन पुस्तकं, वह्या, दप्तर, गणवेष, रेनकोट, पावसाळी चपला कितीतरी खरेदी करायची असायची. मग बाबा पुण्यात आले की आमची तिघांची खरेदी हा एक मोठा कार्यक्रम असायचा. इतर ऋतुंपेक्षा मला पावसाळा आवडतो त्याचं हे ही एक कारण असू शकेल. (मिरच्या कोथिंबिरीपासून ते अगदी गाडीपर्यंत काहीही खरेदी करणं हा माझा आवडता छंद आहे. त्याविषयी नंतर कधीतरी)
पावसाळा तर मला वेड लावणारा ऋतू आहे. पाऊस मग तो कसाही असला- रिमझिम, भुरभुर, सरीवर सरी, धो धो कोसळणारा तरीही मला त्याचा कधीच कंटाळा येत नाही. एखाद् दुसरा पाऊस पडायचा अवकाश, सगळीकडे हिरवी पाती तरारून येतात. इतक्या भाजून काढणार्‍या उन्हात तगून रहायचं आणि जीवनाचा एक थेंब मिळताच फुलून यायचं, कुठे मिळत असेल ही शक्ती ह्यांना?
पुणे मुंबई प्रवास पावसाळ्यात करणं म्हणजे स्वर्गसुख आहे. खंडाळ्याच्या घाटात सृजनाचा उत्सव चालू असतो. अगदी रस्त्यावर उतरलेले ढग, कड्यांवरून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे, पावसाच्या धारांनी आणि धुक्याने धूसर झालेला आसमंत, आणि नजर व्यापून उरणारी हिरवाई.
मागच्या वर्षी पहिल्यांदाच स्वत:च्या गाडीतून केलेला पावसाळ्यातला प्रवास मी कधीच विसरणार नाही. गाडीच्या टपावर आणि काचांवर नाचणारा पाऊस, चकचकीत काळाशार रस्ता आणि गाडीत अखंड पावसाच्या गाण्यांची सोबत. प्रवास कधी संपला कळलंसुद्धा नाही. बाकी पावसाळ्यात लोणावळा, सिंहगड वगैरे ठिकाणी तर इतके वेळ गेलो आहे की त्याच्या आठवणी वेगळ्या काढणं केवळ अशक्य आहे.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा काही दिवस मी मुंबईला होते, तेव्हा पावसाळ्यात मी मरिन ड्राईव्हला गेले होते. वरून हलकेच कोसळणारा पाऊस आणि उधाणलेला समुद्र यांनी अगदी आतून बाहेरून चिंब चिंब करून टाकलं.
मागच्या वर्षी पुण्यात अगदी मुसळधार पाऊस झाला. कितीतरी वेळा धरणाचे सगळे दरवाजे उघडून नदीत पाणी सोडलं होतं. ते बघायला जायला मुहूर्तच लागत नव्हता. अचानक एके दिवशी ऑफीसला जाताना कोसळणारा पाऊस बघून खडकवासल्याला जायचं ठरलं. धरणाचे नऊ दरवाजे उघडले होते. आणि प्रचंड वेगाने, रोरावत, उसळ्या घेत पाणी नदीत पडत होतं. त्यादिवशी अवाक् होणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ मला कळला. (त्यादिवशी ते पाणी बघत भिजत भिजत खाल्लेल्या वडापाव आणि भज्यांची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.) पावसाचं नाव काढलं की ह्या दोन आठवणी अलगद माझ्या मनात उतरतात- पावसातल्या शुभ्र धुक्यासारख्या.

क्रमश:

मंगळवार, फेब्रुवारी २०, २००७

ऋतुरंग १

"ऊन वाढत चाललंय ना सध्या?"
"हो ना! कटकटच आहे बाई आता चार महिने उन्हाळा म्हणजे! मला इतका राग येतो ना उन्हाळ्याचा!" इति मैत्रिण.
मला कळेचना की इतका अगदी राग राग करण्यासारखं काय आहे उन्हाळ्यात? आणि ते ही पुण्याच्या उन्हाळ्याचा? मग विदर्भात वगैरे तर काय करेल ही बाई?प्रत्येक ऋतूचं स्वत:चं काही वैशिष्ट्य आहे तसा त्रासही असणारच. पण त्याचा त्रास आपण करून घेण्यात काय अर्थ आहे?
सगळीकडचं भयानक ऊन, पंचेचाळीसच्या जवळपास जाऊ पहाणारं तापमान, अंगाची लाही लाही हे सगळं सहन करून मी उन्हाळ्याला दोन गोष्टींसाठी अगदी माफ करू शकते - आंबा आणि मोगरा!!
अगदी लहानपणापासूनच माझ्या मनात उन्हाळ्याचं अगदी खास स्थान आहे. महाशिवरात्रीला दिवसभराचा उपास करून आम्ही सगळेजण संध्याकाळी उसाचा रस प्यायला जायचो. त्या मोसमातला पहिला रस! तेव्हापसूनच खरे उन्हाळ्याचे, वार्षिक परिक्षेचे आणि त्यानंतरच्या मोठ्या सुट्टीचे वेध लागलेले असायचे. परिक्षा संपून सुट्टी लगेपर्यंत ऊन चांगलंच तापायला लागलेलं असे. मग दररोज सकाळी ऊठून पर्वतीवर फिरायला जायचा कर्यक्रम अगदी ठरलेला असे. सकाळच्या सुखद गारव्यात पर्वतीवर फिरताना इतकं छान वाटायचं!
मग घरी येऊन भरपूर हुंदडून झालं की की मग दुपारी कोणाच्या तरी घरी जमून पत्ते, सागरगोटे, व्यापार असे बैठे खेळ खेळायलाही तितकीच मजा यायची. शिवाय बरोबर करवंदं, जांभळं, कैर्‍या, कलिंगड अश्या कितीतरी गोष्टींची रेलचेल असायची.
नंतर इंजिनीयरींगला गेल्यावर मला सर्वात वाईट कशाचं वाटलं तर उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासात घालवावी लागणार ह्याचं! म्हणजे कल्पना करा की मस्त आमरस-पुरीचं जेवण झालंय. वरती माठातलं वाळ्याच्या वासाचं गार पाणी पिऊन झालंय. अश्यावेळी माणूस मस्त गरगर पंखा लावून ताणून देईल की पुस्तक घेऊन अभ्यास करत बसेल???उन्हाळ्याच्या सगळ्या आठवणींना मोगर्‍याचा गंध आहे असं वाटतं मला. मोगर्‍याच्या गंधाच्या तोडीस तोड जगात एकच गंध आहे तो म्हणजे पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध! उन्हाळ्यातली रात्र, आसमंतात भरून राहिलेला मोगर्‍याचा दरवळ, टिपूर चांदणं आणि गचीवर जमलेली गप्पांची मैफिल. सुख सुख म्हणतात ते याहून वेगळं काय असणार!!

क्रमश:

मंगळवार, फेब्रुवारी १३, २००७

झीज

मी उभा होतो किनार्‍यावर
शांत, स्तब्ध, निश्चल
आणि एक तडाख्यात चिंब चिंब करून गेलीस तू....
वरवर तसं काहीच नाही बदललं
पण आतपर्यंत काहीतरी हललं नक्कीच
थोडंसं गूढ, तरी हवंहवंसं..
तू भरतीचं उधाण लेऊन येताना,
कोसळलीच तुझी आतुरता
आणि ओहोटीसंगे मागे फिरलीस ना,
तेव्हा जाणवली तुझी कासवीस नजर......
असह्यच झाला मला माझा निश्चलपणा!
आणि मग हळूहळू
कणाकणाने तुटत गेलो मी
आता इतरांनाही जाणवलाय बदल
लोक म्हणतात 'खडक झिजला किनार्‍याचा'
बरोबरच आहे, त्यांना कसं कळणार
आता माझा प्रवास अखंड तुझ्या सोबतच-
किनार्‍यावरची रेती होउन!!!

ह्या रुपयांबरोबर तुम्ही काय कराल?

ह्या रुपयांबरोबर तुम्ही काय कराल?

आज सकाळी ऑफीसला येताना रेडिओ मिरची लावण्याची दुर्बुद्धी का झाली मला? मी एकतर कधीही रेडिओ लावावासा वाटला की विविध भारतीच लावते. पण सकाळी विविध भारतीवरही 'चित्रलोग' नावाचा विचित्र कार्यक्रम असतो म्हणून मिरची लावायची वेळ आली. कसली चर्चा चालली होती कळलं नाही. पण त्या 'आर जे अनिरुद्ध' नावाच्या माणसाने '२८ कोटी रुपयांबरोबर तुम्ही काय कराल' अस प्रश्न विचारलेला ऐकून माझं डोकंच सटकलं.
एकूणच सध्याच्या 'मराठी' म्हणवून घेणार्‍या वाहिन्यांवरची मराठी भाषा ऐकणं कठीण आहे. सध्याच्या रिमिक्सच्या युगात थोडेफार इतर भाषांमधले शब्द वापरले जाणारच. अगदी शुद्ध साजूक तुपातल्या मराठीची अपेक्षा नक्कीच नाही. पण भाषेचे किमान नियम तरी पाळावेत हवेत की नाही??? सगळं स्क्रिप्ट आधी हिंदीमधे लिहून नंतर शब्दश: मराठीत भाषांतर केलंय असं वाटतं.
उदाहरणार्थ:'ह्या २८ कोटी रुपयांबरोबर तुम्ही काय कराल(इन रुपयोंके साथ आप क्या करेंगे?)
माझी मदत कर. (मेरी मदद करो)
तो मला बोलला (वो मुझे बोला) वगैरे वगैरे.
ही सगळी वाक्य खरं म्हणजे ह्या पैशांचं काय कराल, मला मदत कर, तो मला म्हणाला अशी असायला हवीत हे अभिनय करणार्‍या लोकांच्याही लक्षात येत नाही का? तमाम व्हीजे , आरजे मंडळींना कोणतीच भाषा शुद्ध का बोलता येत नाही? विशेषत: विविध भारती ऐकून नंतर मिरची वगैरे ऐकलं की हा फरक ठळकपणे जाणवतो.शुद्धलेखनविषयी तर न बोललेलंच बरं! काही दिवसांनी एकेकाळी 'शुद्धलेखनासाठी काही गुण राखून ठेवले आहेत' अशी सूचना असायची यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.सध्यातरी ह्या बाबतीत काही 'व्यापक कार्यक्रम' वगैरे सुचत नाहीये मला. पण किमान माझ्या ब्लॉगवर तरी शुद्ध मराठीत लिहिणं माझ्याच हातात आहे ना!

सोमवार, फेब्रुवारी १२, २००७

घरटं

ती

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू
आणि नदीसारखी स्थिर, शांत मी
उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू
आणि जमिनीशी नातं जोडणारी मी
क्षितीजाच्यापार झेपावणारा तू
आणि किनार्‍यावरच वाळूचं घरटं जपणारी मी
'साथ देशील का' विचारतोयस खरा
पण भीती वाटते मला,हे सगळं कसं काय जमणार मला?
****
तो

कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना
पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून
त्याला शक्ती देणारी नदीच असते ना?
वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी
मुळं घट्ट धरून ठेवून
त्याला आधार देणारी जमीनच असते ना?
आणि वेडे,पक्षी क्षितिजापार झेपावला तरी
समुद्रावर थोडच विसावणार तो?
संध्याकाळी परतून यायला,घरटंच हवं ना त्याला?