सोमवार, एप्रिल ०९, २००७

कर्तृत्त्ववती

आजी! आपल्या सगळ्यांचा किती जिव्हाळ्याचा विषय असतो नाही? आजीची मायाच अशी असते, दुधावरच्या सायीला जिवापाड जपणारी! माझा आणि आजीचा (बाबांची आई) सहवास उणापुरा ९ वर्षांचा. पण त्यातही आजीकडुन जे बाळकडू मिळालं ते मला जन्मभर पुरेल. ती गेली तेव्हा फारसं काहीच मला कळत नव्हतं. पण आज जेव्हा मी विचार करते, तेव्हा तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कितीतरी सुरेख पैलू मझ्या लक्षात येतात. आजी म्हटलं की सर्वात आधी मला आठवतं ते तिचं करारी व्यक्तिमत्त्व. भरपूर ऊंची, सणसणीत बांधा, आणि एकूणच देहबोलीतून जाणवणारा निग्रहीपणा. तिच्याकडे बघितलं की वादळवार्‍याचा सामना करून पुन्हा ताठपणे उभ्या राहणार्‍या वटवृक्षाची आठवण व्हावी. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असणारी माझी आजी. बुद्धीने अतिशय तल्लख. त्याकाळात उत्तम गुण मिळवून फायनलची परीक्षा उतीर्ण झाली होती. पाठच्या तीन बहिणी. तेव्हा कोणीतरी माझ्या पणजीला सांगितलेलं की तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. त्यामुळे फायनल झाल्या झाल्या पंधराव्या वर्षीच तिचं लग्न झालं. खरोखरच तिच्या लग्नानंतर तिला भाऊ झाला. माझे बाबा आणि त्यांचे मामा दोघेही एकाच वयाचे. आता मी विचार करते तेव्हा मला ही गोष्ट खूप मजेशीर वाटते. पण बहुधा त्यावेळच्या काळत ही सामान्य बाब असावी. सासरी देखील माझी आजी सर्वात मोठी सून असल्याने तिच्यावर मोठी जबाबदारी होती. सततचे पाहुणे, धाकटे दीर, नणंदा, त्यांची लग्न, बाळंतपणं सारं काही तिने केलं. सगळं तसं सुरळीत चाललेलं असताना अचानकच तिच्यावर फार मोठा आघात झाला. आजीचं वय अवघं बावीस वर्षाचं असताना माझे आजोबा गेले. तेव्हा माझे बाबा फक्त पाच वर्षांचे, आत्या अडीच वर्षाची आणि आजीला सातवा महिना. सार्‍या घरावर अक्षरशः आभाळ कोसळलं. ती माझी दुसरी आत्या आठ महिन्यांची होऊन गेली. "धाकटी लेक गेली तर दुःख करत बसायलाही मला सवड नव्हती. ती गेली तर निदान मी ह्या दोन मुलांसाठी तरी कमवून आणायला मोकळी झाले." आजीचे हे उद्गार आज आठवले, की त्यामगची तिची अगतिकता जाणवून डोळे पाणावतात.
घरच्या लोकांचा प्रचंड विरोध पत्करून आजीने नोकरी शोधायला सुरुवात केली. त्याकाळी (१९५५) फायनल पास झालेल्या सरकारी नोकरी मिळणं तसं काहीच अवघड नव्हतं. परंतु घरच्या लोकांनी पूर्णच असहकाराचं धोरण स्वीकारलं होतं. घरात येणारी नोकरी संदर्भातली पत्र आजीपर्यंत पोचूच देत नसत. शेवटी आजीने पत्रव्यवहारासाठी वेगळा पत्ता दिला. आणि त्यानंतर आलेली पहिली संधी - ग्रामसेविकेची नोकरी पत्करली. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना पुण्यातच ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रामसेविकेच्या नोकरीत भरपूर फिरावं लागत असे. दररोज मैलोनमैल चालावं लागे. तशीच काही अडचण असली तर रात्री बेरात्री सुद्धा कुठे कुठे जावं लागे. तरूण वय, त्यातही नवरा नसताना खेड्यापड्यात राहून हे सगळं करणं अतिशय कठीण काम होतं. पण आजीने हिमतीने सगळं केलं. अजूनही दुर्गाम आणि मगास असलेल्या जव्हार-मोखाड्यासारख्या आदिवासी भागात तिने साठच्या दशकात नोकरी केलेली आहे. ’तुला भीती नाही का वाटायची?’ असं विचारलं तर म्हणायची, ’कसली आलीये भीती? भूत - बित आलं तर तेच मला घाबरून जाईल. आणि बाळा, तेव्हा नोकरी टिकवणं हे एकमेव ध्येय होतं. त्यामुळे भीती वगैरे गोष्टींना काही थाराच नव्ह्ता.’ ही नोकरी तिने बाबांना नोकरी लागून आत्याचं लग्न होईपर्यंत केली. पुढे आई-बाबांचं लग्न झाल्यावर बाबांना Air Force quarters मिळाले आणि मग बाबांना इतक्या वर्षांनी आईजवळ रहायला मिळालं. तेव्हा आजी अगदी टिपिकल सासू होती. आई बाबा एकत्र सिनेमाला वगैरे गेलेले तिला आवडत नसे. आईला कानात रिंगा घालायलाही तिने परवनगी दिली नाही. पण आई आणि बाबांनी नेहेमीच तिला समजून घेतलं. आयुष्यभर कोणतीच हौस मौज करायला न मिळाल्यामुळे तिचा स्वभाव असा कडवट झाला असेल काय? नंतर आजीदेखिल खूपच निवळली. आणि आईशिवाय तर तिचं मुळीच पान हलत नसे. आजीचा स्वभाव सतत माणसं जोडत रहाणारा होता. घरातले सगळे लोक, नातेवाईक, इतकंच काय पण बाबांच्या सगळ्या मित्रांनाही माझ्या आजीचा खूप आधार वाटत असे. खचून गेलेल्या माणसाला नुसत्या योग्य शब्दांनी उभारी कशी देता येते हे मी आजीकडून शिकले. जे काही काम कराल ते उत्तमच केलं पाहिजे अस आमच्या आजीचा कटाक्ष असे. तिचं प्रत्येकच काम इतकं देखणं असे की नजर ठरत नसे.शिस्त हाही एक अतिशय महत्त्वाचा विषय. आजीची इतकी कडक शिस्त होती घरामधे! तेव्हा तिच्या काही काही गोष्टींचा राग यायचा, पण आता कळतं की लहानपणी तिने लावलेल्या छोट्या छोट्या सवयी आज किती उपयोगी पडतात. आपल्या घासतला घास दुसर्‍या गरजू माणसाला दिला पाहिजे हे ही तिने सतत आमच्या मनावरती ठसवलं. आजीची एक मजेशीर सवय म्हणजे दर एक-दोन वाक्यांनी तिच्या बोलण्यात एक म्हण असायची. खेडेगावात राहिल्यामुळे तर तिच्या ह्या म्हणींच्या संग्रहात खूपच भर पडलेली होती. आम्ही अगदी फारच त्रास द्यायला लागलो की ती आम्हाला ’अगं बाई, घटकाभर सुभद्राबाई काळे ( हे तिच्या आईचं नाव) हो’ असं म्हणत असे. ते ऐकायला तेव्हा खूप मजा वाटायची. आजही तिच्या तोंडून ऐकलेल्या काही म्हणी सहज बोलण्यात वपरल्या जातात. आणि बरोबरीचे लोक ही कुठेली म्हण काढलीस असं म्हणतात, तेव्हा तिने कळत नकळत आमच्या शब्दभांडारात केवढी भर घातली आहे हे जाणवतं.
दूरदॄष्टी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता हेही आजीचे घेण्यासारखे गुण होते. माझ्या आतेभावाला commerce मधे फारसं करियर करता येणार नाही, हे कळल्यावर तिने स्वतः निर्णय घेऊन त्याला योग्य वेळी ITI घातलं. माणसाचा कल ओळखून त्याप्रमाणे त्याला उत्तेजन द्यायचं हे आजीचं वैशिष्ट्यच होतं. आयुष्यात इतकं काही भोगूनही आजीनी स्वतःचं दुःख कधीही उगाळलं नाही. तिच्या आयुष्याकडून अपेक्षादेखिल खूप साध्या होत्या. पण स्वत:च घर हा तिचा अगदी वीक पॊईंट होता. आजीला ’जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं अजिबात आवडत नसे. "असं म्हणावं अशी वेळ अजूनतरी माझ्या अयुष्यात आली नाही. जेव्हा स्वतःचं घर होईल तेचा मी हे गाणं रेकॊर्ड करून घेईन आणि मग सतत तेच ऐकत बसेन. एकदा का आपलं स्वतःचं घर झालं, की राजीव गांधी एका बाजूला आणि मी एका बाजूला" (म्हणजे पंतप्रधानांइतकी सुखी) असं ती म्हणत असे. तिचं हे स्वप्न मात्र ती असताना पूर्ण झालं नाही. वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षीच आपलं स्वप्न अर्धवटच ठेवून ती गेली. मी चौथीत असताना शिष्यवृत्तीच्या परिक्षेला बसले होते. तेव्हा सगळे प्रश्न उतरवून घ्यायचे आणि मग त्यापुढे उत्तरं लिहायची असं आम्हाला शाळेत सांगितलं होतं. मला लिखाणाचा फार कंटाला यायच. तेव्हा आजी दररोज मला सगळे प्रश्न dictate करत असे. आणि मग मि ते सोडवत असे. तिने पूर्ण वर्षभर माझा असा अभ्यास करून घेतला. परंतु दुर्दैवाने मला शिष्यवृत्ती मिळली तेव्हा आजी या जगात नव्हती. त्यादिवशी निकाल कळल्या-कळल्या धो धो रडल्याचं मला आजही आठवतं. आज चतुर्थी. आजीला जाऊन आज बरोबर १७ वर्ष झाली. या सतरा वर्षात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. कधीही अगदी खचून गेल्यासारखं झालं की आजीची शिकवण आठवते आणि आपोआपच सगळं frustration कुठच्या कुठे पळून जातं. सगळ्या संकटांचा हिमतीने सामना करणारी कतृत्त्ववान आजी नेहेमीच माझा आदर्श आहे.

५ टिप्पण्या:

रुपाली सागडे कुलकर्णी म्हणाले...

खूप छान लिहिले आहेस..आजी अगदी डोळ्यासमोर उभी राहिली.

Monsieur K म्हणाले...

very well written. your grandmother is indeed a role model and a source of inspiration.

अपर्णा म्हणाले...

धन्यवाद मनस्विनी, केतन :)

Aparna म्हणाले...

Very nice article. Reminds me of my Aajji who uses 'mhaNee' so very often !

Do write something about 'Aajji chya mhaNee' - I will love to add them to my collection of mhaNee from 'my Aajji'! :)

Best,
Aparna

Dk म्हणाले...

too good :)